Saturday, 2 December 2017

तिची शक्ती
        सर्वांची युती
                  घडवेल क्रांती.....
                  १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आता सुरु आहे २०१७, ७० वर्षे झाली भारताला स्वातंत्र्य मिळून.पण आपल्याला पूर्ण पणे स्वतंत्र्य मिळाले आहे का नाही ही विचार करण्याजोगी बाब आहे.स्वातंत्र्य या शब्दाची व्याख्या ही प्रत्येकासाठी भीन्न असते.अनेक प्रश्न पडतात आणि मनात विचार येतो भारत स्वतंत्र आहे खर "ती स्वतंत्र आहे का?"
                  मुलगा घरात १२ वाजता आलेला चालतो पण मुलीला यायला ७ वाजून १५ मिनिटे जरी झाली तरी घरातील वातावरण बदलते.अर्थात या मागे तिची काळजी, तिच्या वरची माया, प्रेम ही आणि हीच कारणे असतात पण काळजी ही मुलीचीच  का? रात्र या गोष्टीची भिती मुलीलाच का? एकटा मुलगा रात्री बेरात्री कुठेही कसाही प्रवास करू शकतो मग मुलीने अथवा स्त्रीनेच का घाबरायचे? या प्रश्नामध्येच दडलंय तीच स्वातंत्र्य....
                  पालकांना मुलीची काळजी वाटणं सुद्धा सहाजीकच आहे म्हणा.भारतीय स्त्री सुरक्षित आहे का नाही हाच भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. २०१६ च्या अहवालानुसार भारतामध्ये सुमारे २४,९२३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले.या भयानक आकड्यांमुळे कोणत्याही पालकांना काळजी वाटणे अत्यंत स्वभाविक आहे. हे आकडे पाहून माणुसकीवरचा विश्वासच उडतो, विश्वास नसेल तर भितीचे आगमन हे होणारच. या भितीपायीच अनेक वेळी ,अनेक ठिकाणी अनेक गोष्टींचा अनुभव भारतीय स्त्रिला घेता येत नाही.मग या परिस्थितीत स्त्री स्वतंत्र आहे असे म्हणायचे कि नाही यावर विचार करावा लागेल आणि मूळ मुद्दा म्हणजे एव्हढे सगळे करून स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी मात्र मिळतच नाही.
                  सवतंत्र्याच्या आधी प्रश्न उद्भवतो तो म्हणजे अस्तित्वाचा.कायद्यानं लिंग पडताळणीच्या चाचणीला जरी निर्बंध घातला असला तरी लिंग भेदाच्या मानसिकतेचं काय? गर्भात असेपर्यन्त ती सुरक्षित असेल खर गर्भाबाहेर आल्यावर काय? अजूनसुद्धा कित्येक ठिकाणी मुलीला दुय्यम समजले  जाते,वंशाच्या दिव्याला प्राध्यान्य दिले जाते पण त्या वंशाच्या दिव्याला ९ महिने तेवत ठेवणाऱ्या त्या वातीकडे मात्र कुणाचं लक्ष देखील जात नाही. मुलगाच हवा या हट्टाला पेटलेली कित्येक कुटुंबे आपण आजही पाहतो.या हट्टापायी ना त्या जन्मलेल्या मुलीची किंमत राहत ना त्या जन्मदात्या माऊलीची .आणि वंशाचा दिवा पेटावा म्हणून त्या वातीला किती वेळा पेटवतील याचा तर काही नेमचं नाही.
                     तर या झाल्या समस्या आणि सध्याची परिस्थिती.स्त्री ही मुलगी म्हणून जन्माला येईल तर तिला मुला इतकाच मान मिळेल याची शाश्वती नाही .जरी तिला तिचे अस्तित्व मिळाले तरी हवे तसे जगायचे  स्वतंत्र मिळेलच याची खात्री नाही  आणि  एवढी दिव्ये पार करून कोणती स्त्री उभी राहिलीच तर तिच्या सुरक्षिततेची हमी नाही.
                  ही परिस्थिती तर बदलली पाहिजेच.बदल हा घडलाच पाहिजे.पण हा बदल घडवणार कोण? हा बदल घडवणे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या हातात आहे. नाही नाही मी निश्चितच आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेणार नाहीए .एकाच व्यक्तीवर आपण किती आणि कोणत्या जवाबदाऱ्या टाकणार आहोत.तर हा बदल घडवू शकणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी  कोणी नसून स्वतः भारतीय स्त्रीच आहे.
                  "हो आता तुलाच वाचवावे लागेल तुझे अस्तित्व…… आता तुलाच सिद्ध करावे लागेल तुझे कर्तृत्व…..आता तुलाच दाखवावी लागेल तुझी शक्ती….तुझी एकी व तू आणि तूच घडवशील क्रांती...."
               कुठलीही वाईट गोष्ट होऊ नये म्हणून काळजी घेणे अत्यंत योग्य आहे.पण कठीण प्रसंग येईल म्हणून सतत बचावात्मक व्यक्तीमत्व ठेवणे म्हणजे युद्धाच्या वेळी घरात बसण्यासारखेच आहे. आपण आपल्या मुलीबरोबर काही वाईट होऊ नये म्हणून सतत तिला आपल्या  डोळ्या समोर ठेवतो,सतत तिला जपतो ,यात नक्कीच काही अयोग्य  नाही परंतु आपण कधी असा विश्वास दाखवत नाही की आपली मुलगी वेळ प्रसंगी कुठल्याही वाईट परिस्थितीचा सामना करू शकते,ती स्वरक्षण करू शकते ,ती लढू शकते आणि ती जिंकू शुद्ध शकते.
               स्त्री हि नैसर्गिक नियमानुसार कमजोर यासारखी मूर्खपणाची संकल्पना मी ऐकली नाही.आपण त्यांना कमजोर म्हणतो,बनवतो आणि म्हणून त्या कमजोर होतात.स्त्रीला कमजोर म्हणणाऱ्यांनी २ किलोचा दगड ९ महिने तर लांबची गोष्ट  साधा ९ तास आपल्या पोटाला बांधावा म्हणजे कळेल किती ताकद असते एका स्त्री मध्ये ते..
              जर स्त्रिया स्वतःच स्वतःला कमजोर समाजत राहिल्या तर ही परिस्थिती बदलणे शक्य नाही.बलात्कार केलेल्या व्यक्तीला ५ वर्षांनी फाशी होणं हा तुमचा विजय नाही.फाशी मुळे व्यक्ती नष्ट झाली पण जेंव्हा तुमच्या शक्ती आणि युतीच्या जोरावर तुम्ही बलात्कारी वृत्तीचा नाश कराल तोच तुमचा विजय असेल.बलात्कारी वृत्ती इतक्या सहज सहजी नष्ट होणार नाही.त्यासाठी प्रत्येक मुलीला स्वरक्षणासाठी आत्मविश्वासाने आणि स्वबळाने पाऊले उचलावी लागतील.५ बलात्कार्यां पैकी कोणा एकाला तरी आपण त्याची बहीण वाटू ही अपेक्षा ठेवून आता चालणार नाही. तसेच मी फोन करून मदत बोलवीन आणि कोणतरी येऊन माझी मदत करेल असे अवलंबून राहणे सुद्धा अयोग्यच. आता वेळ आहे स्वतःच स्वतःचे रक्षण करायची. स्वतःच स्वतःची मदत करायची.स्वतः लढायची आणि स्वतः जिंकायची.
                  कराटे,ज्युदो,तायक्वांदो,लाठीकाठी,दाणपट्टा,बॉक्सिंग,मार्शल आर्टस् अश्या खेळांकडे एक गरज म्हणून पाहण्याची गरज आहे.मार्ग खूप आहेत स्वतःला बलवान बनवायचे फक्त त्या मार्गांचा स्वीकार करणे गरजेचे आहे.स्त्री सौरक्षण वर कार्यरत असलेल्या विविध सौंस्थांमध्ये सहभाग ,स्वरक्षणासाठीचे सर्व आधुनिक उपाय तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांमुळे स्त्री सुद्धा स्वतःचा बचाव करू शकते.गरज आहे ती संघटित होण्याची,एकत्र येऊन लढण्याची. हा लढा स्त्रीलाच लढावा लागेल. नाहीतर निष्पाप स्त्रिया आणि अमानुष बलात्काऱ्यांची नावे बदलण्यापलीकडे काहीच बदलणार नाही. स्त्री एकत्र येऊन लढली तर नक्कीच यशस्वी होऊ शकते.स्त्री ने स्वबळाच्या जोरावर,स्वावलंबी होऊन संकटांचा सामना केला तर बलात्कारी व्यक्तीच काय तर बलात्कारी वृत्तीचा सुद्धा समूळ  नायनाट होईल.
                जेंव्हा मुलगी जन्मल्यावर तिला मुलांइतकाच मान मिळेल आणि जेंव्हा कोणतीही मुलगी, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी निर्भीड पणे वावरू शकेल तोच असेल आपला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन!!!
         
                                                      मल्हार माधव देवस्थळी.